संगमनेर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थांचा शैक्षणिक पाया भक्कम होतो. यावरच पुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक इमारत भक्कम उभी राहते. शिक्षक हे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि कार्यक्षम बनविण्याचे कार्य करतात, असे लेखक व कवी अनिल देशपांडे म्हणाले.
शुक्रवारी (दि.५) संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. सरपंच सुदाम खैरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे, सदस्या सुनीता घुले आदी उपस्थित होते. शाळेचे शिक्षक व शिक्षिकांनी तुम्हाला छान घडवले यांचा आनंद साजरा करा, असेही कवी देशपांडे म्हणाले.
याप्रसंगी मिशन-आरंभ व मंथन परीक्षेतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून कंपास पेटी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पंखा भेट दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदवीधर शिक्षक आर. जी. पावसे, सुरेश साळुंके, दस्तगीर शेख, सखाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, सोमनाथ मदने यांनी परिश्रम घेतले. शकुंतला शेळके यांनी आभार मानले.