महापालिकेचा सहभाग : नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यूसह इतर साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने दर रविवारी स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत. ही मोहीम मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यापासून सुरू करण्यात आली असून यात नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
शहरात हिवताप, डेंग्यू व चिकुनगुनिया या कीटकजन्य रोगांची साथ उद्भवू नयेत याकरिता नागरिकांनी त्यांचा रहिवासी परिसरात डासोत्पत्ती टाळणे आणि व्यक्तिगत काय काळजी घ्यावी, याबाबत मनपातर्फे व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. डासांच्या अंड्यापासून प्रौढ डास बनण्याच्या प्रक्रियेला ७ ते १० दिवस लागतात, त्यामुळे हे चक्र तोडण्याकरिता कोरडा दिवस पाळणे आणि आपल्या घराच्या परिसरामध्ये डासोत्पत्तीची स्थाने शोधून नष्ट करणे अशी अभियानाची संकल्पना आहे.
तपासणी, धुरीकरण, कीटकनाशक फवारणीचे काम सुरू आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सुरुवात मनपाचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी करावयाची आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घराच्या परिसरामध्ये अस्वच्छता व डासोत्पत्ती होणार नाही याकरिता काळजी घेऊन परिसरातील नागरिकांमध्येही करावयाची आहे
घर, परिसरात पाणी साचू देऊ नका
मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांनी पुढील चार महिने आपल्या घराच्या आतील व बाहेरील पूर्ण परिसराचे परीक्षण करावे, घरांमध्ये आणि घराच्या आजूबाजूला कंटेनरमध्ये, टायरमध्ये पाणी साचू देऊ नये. साठवलेल्या पाण्याचे भांडे, ड्रम झाकून ठेवावे. पक्ष्यांचे पाणी पिण्याचे टब, भांडी, फुलदाण्या, रेफ्रिजरेटरखालील ट्रे इत्यादी तपासून घ्यावे व ते रिकामे करावेत. पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून छतावरचाघनकचरा साफ करावा. कार्यवाही करतानाचे फोटो समाजमाध्यमांवर छायाचित्रे, व्हिडिओ टाकून या मोहिमेला अधिकाधिक प्रसिद्धी देण्यात यावी. नागरिकांनीही अशाच पद्धतीने आपले घर व परिसरात मोहीम राबवावी, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.