श्रीगोंदा : येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी आदिवासी, भटक्या- विमुक्त जाती-जमातीतील झोपडीत जाऊन शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेश भेट दिले. 'मुलांनो चला जाऊ शाळेत' उपक्रम सामाजिक जाणिवेतून राबविला आहे. पाटी अन् पेन्सिल मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
श्रीगोंदा फॅक्टरी येथील आदिवासी, भिल्ल वस्ती असणाऱ्या परिसरामध्ये शाळाबाह्य मुले आढळून आली. न्यायाधीश शेख हे शाळाबाह्य मुलांना पुस्तके, गणवेश, पुष्पगुच्छ देऊन त्यांना व त्यांच्या आई-वडील यांना शाळा शिकण्याचे महत्त्व समजावून सांगत आहेत. त्यांचा शाळेत प्रवेश घडवून आणत आहेत. न्यायाधीश घरी येऊन मुलांना पुस्तके, गणवेश देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करत आहेत. इंदिरा गांधी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुजीब शेख यांनी पोस्को कायद्याबद्दल माहिती तसेच ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना काही टिप्स दिल्या. यावेळी शेख यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा श्रीगोंदा फॅक्टरी येथे तसेच जिल्हा परिषद शाळा जोशी वस्ती व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र, वकील संघाचे अध्यक्ष अशोक वाळूज, उपाध्यक्ष अक्षय जठार, वकील अशोक रोडे, अॅड. वर्षा घालमे, विठ्ठल जंगले, नागवडे साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी आभार मानले.