संगमनेर : तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा आमदार थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात यांनी दिली.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी मोठा पाठपुरावा केला आणि यातून प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२३ मधून अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक पीक विमा हा संगमनेर तालुक्याला मंजूर झाला आहे. यात मध्यम नुकसानभरपाईची अग्रीम रक्कम ३३.८६ कोटी रुपये मंजूर झाली असून, स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी १० लाख ६५ हजार रुपये आणि अंतिम पीक कापणी प्रयोगावरून आलेल्या उत्पन्नावर आधारित विमा रक्कम एकूण ९५ कोटी १ लाख रुपये, असे एकूण १२८ कोटी ९८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी उपविभागीय कृषी विलास अधिकारी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, ओरिएंटल क्रॉप इन्शुरन्स कंपनी, सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक पदाधिकारी यांनी मोठी मदत केली.