मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे १५ ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. या बसेसद्वारे १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ९ लाख ५३ हजार भाविक, प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून २८ कोटी ९२ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून यात्रेसाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळ्या ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील झालेल्या रिंगण सोहळ्यासाठी २०० बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
एसटीवर प्रवाशांनी दाखवलेल्या विश्वासाला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सार्थ ठरवले आहे. यापुढे जनतेला अशाप्रकारे सेवा देण्यासाठी महामंडळ कटिबद्ध राहील. - डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष, एसटी महामंडळ