कोपरगाव धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे विविध धरणातून जायकवाडीला मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. परंतु कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पर्जन्यमान न झाल्यामुळे अजूनही कित्येक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सुरु असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.
दिलेल्या पत्रात आमदार काळे यांनी म्हटले आहे की, गोदावरी आणि प्रवरा नदीला पूर आला असला तरी अद्यापही कायमस्वरूपी पर्जन्यछायेखाली असलेल्या कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
प्रत्येक गावाची लोकसंख्या दोन ते ते तीन हजारावर आहे. त्यामुळे बहुतांश गावात आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून नागरिकांच्या व पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गोदावरी उजवा तट कालवा, गोदावरी डावा तट कालवा व पालखेड डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील कालव्यावर आधारित असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याकरिता गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरून द्यावेत अशा सूचना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना केल्या आहेत