अहमदनगर : नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशाला केवळ सहा पदके मिळाली आहेत. या पदकांचे कौतुक आहे. परंतु, समाधान देणारी बाब नाही. ऑलिम्पिकमधील पदके वाढवण्यासाठी शुन्यातून सुरुवात करावी लागणार आहे. यासाठी शाळा तिथे क्रीडाशिक्षक इयत्ता पहिलीपासून पाहिजे, अशी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर व महेंद्र हिंगे यांनी केली आहे.
चीनसारखा देश आलिम्पिक पदके जिंकण्याच्या यादीत वरच्या क्रमांकावर असतो. कारण क्रीडा विद्यापीठ स्थापन केलेली आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रीडा प्रशिक्षण दिले जाते. याउलट आपल्या देशात मागील काही वर्षांत कला व क्रीडा शिक्षकांची भरती झालेली नाही. खेळाडू घडवण्यासाठी प्रत्येक शाळेवर क्रीडा शिक्षक पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
शासनाने शाळेत क्रीडाशिक्षक दिले नाहीत तर खेळाडू कसे घडणार? शिवाय नवीन संचमान्यतेत अडीचशे विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक प्रस्थापित आहे. पण, आमच्या मागणीनुसार शाळा तिथे क्रीडा शिक्षक पाहिजे, असे शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघाचे सुनील चव्हाण यांनी म्हटले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवतील एवढ्या दर्जाचे खेळाडू आहेत. परंतु, त्यासाठी कुठल्याही सुविधा किंवा मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक शाळेमध्ये उपलब्ध नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पात्रता असूनही ते खेळापासून वंचित राहतात. ही बाब अतिशय खेदजनक आहे, शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघाचे अमोल ठोंबे यांनी म्हटले आहे.