शिर्डी : बहीण-भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. एकमेकांपासून कितीही दूर असले तरी या दिवशी बहीण भाऊ एकत्र येतात आणि बहीण भावाला राखी बांधते. मात्र, ज्यांना भाऊच नाही, अशा बहिणींचा जीव प्रत्येक राखी पौर्णिमेला कासावीस होतो. अशाच भाऊ नसलेल्या काही बहिणींचा शोध घेऊन त्यांच्या हातून राखी बांधून घेऊन रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम शिर्डीतील वेट एन जॉय वॉटर पार्क आणि साईतीर्थ थीम पार्कमध्ये साजरा करण्यात आला.
शिर्डीपासून जवळच असलेल्या निमगाव आणि निघोज या दोन्ही गावातील कुटुंबात भाऊच नसलेल्या किंवा काहींनी अपघात किंवा इतर कारणांनी भाऊ गमावला, अशा बंधूप्रेमाला पोरक्या झालेल्या भगिनींचा शोध घेऊन त्यांना राखी पौर्णिमेच्या दिवशी निमंत्रित करण्यात आले. थीम पार्कमधील कर्मचाऱ्यांनी याभगिनींकडून राख्या बांधून घेतल्या. आजवर भाऊ नसल्याची खंत कायमच मनात असायची.परंतु आपल्यारूपाने आम्हाला भाऊ मिळाला आणि राखी पौर्णिमा साजरी करण्याची संधी मिळाली, अशी भावना उपस्थित भगिनींनी व्यक्त केली